बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत   

विरोधी पक्षात बसून प्रश्न सुटत नाहीत...

पुणे : सत्ता हातात असली तरच प्रश्न सुटतात. विरोधी पक्षात बसून,  आंदोलने, मोर्चा काढून चालत नाही. आम्ही साधू संत नाही. जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे; त्यामुळेच बेरजेच्या राजकारणासाठी आम्ही भाजपबरोबर गेलो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित  पवार गट) राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी स्पष्ट केले.राष्ट्रवादी काँग्रेसचा २६ वा वर्धापन दिन बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे पार पडला. या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुनेत्रा पवार आदी यावेळी उपस्थित होते.
 
अजित पवार म्हणाले, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हातात सत्ता असणे गरजेचे आहे. समाजातील शोषित, वंचित, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक समाजाला न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच पुढे राहिला आहे. नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे पक्षाचे ध्येय आहे. हे ध्येय सिद्ध करण्यासाठी सत्ता गरजेची आहे. विरोधी पक्षात बसून मोर्चा, आंदोलने करून कोणतेही प्रश्न सुटत नाही. नागरिकांना न्याय देता येत नाही. त्यामुळे लोकांच्या हिताचे काम करण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपला पाठिंबा देऊन त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. 
 
राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राज्यात कोणत्याही पक्षाची एकहाती सत्ता आली नाही. राष्ट्रवादीला कधीही स्पष्ट बहुमत मिळाले नाही. प्रत्येक वेळी कोणाची तरी मदत घ्यावीच लागली. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असताना शिवसेनेला पाठिंबा दिला आणि सत्तेत आलो. मग, जनतेचे प्रश्न सुटावेत आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपला पाठिंबा दिला तर बिघडले कुठे? असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला. 
 
राष्ट्रवादी सत्तेत असल्यामुळे आपल्या सर्वांचाच फायदा होत असल्याचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले. भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) बरोबर जाण्याचा प्रयत्न २०१४ पासून सुरू होता. 
 
त्याबाबत दोन ते तीन वेळा अंतिम निर्णय देखील झाला होता. मात्र, त्यानंतर भूमिका बदलण्यात आली. काँग्रेसचे सरकार असताना २६/११ चा हल्ला झाला. त्यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग होते. तर शरद पवार मंत्रिमंडळात होते. त्यावेळी दहशतवाद्यांवर काहीही कारवाई झाली नाही. पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. २६ नागरिकांची धर्माच्या आधारावर हत्या करण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत काय करू शकते हे जगाला दाखविले, असे पटेल म्हणाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, नरहरी झिरवाळ, हसन मुश्रीफ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कट्टरतावाद कदापी मान्य नाही

महायुतीमध्ये सहभागी होतानाही शाहू-फुले-आंबेडकर विचारांची तडजोड केली नाही आणि यापुढेही करणार नाही, असे सांगतानाच कट्टरतावाद कदापी मान्य नाही. कट्टरतावादामुळे काही काळ फायदा होतो. परंतु, दीर्घकाळ ते टिकत नाही.  समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जायचे आहे. त्यासाठी मी काम करतो आहे. नुसतेच बोलत नाही, तर कृतीतून ते दाखवितो आहे, एकात्मता, बंधूता हेच शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार आहे, तेच विचार घेऊन पक्ष यापुढेही वाटचाल करणार आहे, विचारांशी तडजोड केली, तर पक्ष कमकुवत झाल्याशिवाय राहणार नाही. ही लढाई विचारांची आणि विचारधारेची आहे. ती लढावीच लागणार आहे, असे अजित पवार म्हणाले. या कार्यक्रमास महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे, हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, मंत्री नरहरी झिरवाळ, पुणे शहराचे पूर्व विभागाचे अध्यक्ष सुनील टिंगरे, पश्चिम विभागाचे अध्यक्ष सुभाष जगताप, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
 

Related Articles